NGN News
Latest Marathi News

जोगेश्वरी मातेचा १५ वा वार्षिक पौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : आई जोगेश्वरी मातेचा १५ वा वार्षिक पौर्णिमा उत्सव यंदा प्रथमच खुटवडनगर येथील सिद्धी बँक्वेट हॉल येथे अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या उत्सवात शेकडो जोगेश्वरी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आई जोगेश्वरी मातेचे दर्शन, दुर्गासप्तशती पाठवाचन, नामजप, भक्तिगीत, महाआरती आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.

उत्सवाच्या प्रारंभी दुर्गासप्तशती पाठवाचनासाठी आलेल्या सुमारे २६० महिला भगिनींची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक महिलेचे औक्षण करून त्यांना प्रसाद म्हणून केळी व सुगंधी अगरबत्तीचे वितरण करण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता दुर्गासप्तशती पाठवाचनास प्रारंभ झाला. स्वामी समर्थ केंद्राच्या सेवेकरींसह जोगेश्वरी भक्त मंडळाच्या महिला भगिनींनी मोठ्या भक्तिभावाने पाठवाचन पूर्ण केले. त्यानंतर सामूहिक नामजप आणि चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली.

भाविकांनी मातेसाठी आणलेल्या छप्पन्नभोगाची आकर्षक आणि सुबक मांडणी स्टीलच्या ट्रेमध्ये करण्यात आली होती. उर्वरित प्रसादाचे नियोजनपूर्वक पॅकिंग करून महाआरतीनंतर भाविकांमध्ये वाटप करण्यात आले. प्रसाद व्यवस्थेतील स्वच्छता आणि काटेकोर नियोजनाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदनेने झाली. यावेळी प्रियांका कोठावदे, प्रज्ञा मेतकर, सारिका शिरोडे, पूनम कोतकर, पूनम ततार-अमृतकार आणि विनीता शिनकर यांनी भक्तिमय गीतांचे सादरीकरण करून सभागृहातील वातावरण भक्तिरसाने भारावून टाकले. तसेच अमृतधाम मित्र मंडळाचे राजेंद्र सोनजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आहिराणी भक्तिगीते सादर करून कार्यक्रमात विशेष रंगत आणली.

दुर्गासप्तशती पाठवाचनात सहभागी झालेल्या पहिल्या २५० महिलांमधून लकी ड्रॉद्वारे पाच भाग्यवान महिलांना आई जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादरूपी पैठणी भेट देण्यात आली. या उपक्रमाला उपस्थित महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उत्सवात उत्कृष्ट तबलावादन व ध्वनी व्यवस्थेसाठी श्री. अभिजीत वैद्य, उत्कृष्ट छायाचित्रणासाठी गणेश चिंचोरे तसेच प्रभावी सूत्रसंचालनासाठी सचिन अमृतकर यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

उत्सवाच्या निमित्ताने आई जोगेश्वरी मातेचा देखणा साज, आकर्षक सजावट आणि भक्तांनी अर्पण केलेल्या छप्पन्नभोगाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमादरम्यान सर्व ज्ञात-अज्ञात दिवंगत भक्तांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

महाआरतीनंतर सर्व उत्सव समिती सदस्यांनी सपत्नीक आरती करून राज्य, समाज आणि सर्व भाविकांच्या सुख-समृद्धीची प्रार्थना आई जोगेश्वरी मातेच्या चरणी केली. त्यानंतर जोगवा घेऊन उत्सवाची सांगता झाली. उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत उत्सवाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी मावळते अध्यक्ष प्रविण अलई यांनी संपूर्ण उत्सवाच्या यशामागे सर्व सेवेकरी, महिला भगिनी, स्वयंसेवक, देणगीदार आणि जोगेश्वरी भक्तांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले. तसेच दरवर्षी नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या परंपरेनुसार श्री. जयवंत काशिनाथ बधान यांची नूतन अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. उपाध्यक्षपदी भगवान अलई व दीपक अलई, सचिवपदी शांताराम बधान आणि खजिनदारपदी दीपक लाड यांची निवड जाहीर करण्यात आली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात नूतन कार्यकारिणीचे स्वागत करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

उत्सवाचे नियोजन, धार्मिक कार्यक्रमांची शिस्तबद्ध अंमलबजावणी, स्वयंसेवकांची सेवाभावाची वृत्ती, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि महाप्रसादाची उत्कृष्ट व्यवस्था यामुळे यंदाचा १५ वा वार्षिक पौर्णिमा उत्सव सर्वार्थाने संस्मरणीय ठरल्याची भावना समितीचे जेष्ठ सदस्य श्री गिरीश महाजन, मनोज शिनकर व आदि, तसेच जेष्ठ श्री रमाकांत अलई, श्री डि पी ततार मामा, वाणी समाजाचे प्रथम नागरिक श्री गिरिषजी मालपुरे व आदि सर्वच सदस्य व उपस्थितांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.