
- पुढील पाच वर्षे चोवीस तास संरक्षणाची जबाबदारी
- रामशेज येथे 35 हजार रोपांचे 1 लाख वृक्षांच्या वनात रूपांतर करणारे मॉडेल आता वरवंडीमध्ये
नाशिक: भारतातील आघाडीची क्लाऊड आणि डेटा सेंटर कंपनी ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेड ने नाशिकजवळील वरवंडी येथील वन विभागाच्या परवानगीने जंगल क्षेत्रात यावर्षी 20 हजार झाडांची लागवड केली आहे. ही कंपनीची आतापर्यंतची एका वर्षातील सर्वात मोठी वृक्षलागवड मोहीम आहे. मात्र या उपक्रमाची विशेष बाब केवळ झाडे लावण्यात नाही, तर त्यानंतरच्या जबाबदारीत आहे. ईएसडीएसने या परिसरातील झाडांचे संरक्षण आणि देखभाल करण्यासाठी पूर्णवेळ काम करणारी विशेष टीम नियुक्त केली आहे. ही टीम पुढील पाच वर्षे प्रत्येक ऋतूमध्ये या झाडांची काळजी घेणार असून, त्यांचे संगोपन आणि संरक्षण करणार आहे.
या उपक्रमामागे कंपनीचा यशस्वी अनुभव आहे. 2025 मध्ये ईएसडीएसने वरवंडी येथे लावलेल्या 15 हजार रोपांपैकी 14 हजार रोपे पूर्ण वर्षभर जिवंत ठेवण्यात कंपनीच्या ऑन-ग्राउंड टीमला यश आले. कडक उन्हाळ्यातही ही रोपे टिकली असून त्यांचा 93 टक्क्यांहून अधिक जगण्याचा दर नोंदवला गेला. भारतातील अनेक मोठ्या वृक्षलागवड मोहिमांमध्ये पहिल्याच वर्षात जवळपास निम्मी रोपे नष्ट होतात. यावर्षी लावलेल्या 20 हजार नवीन झाडांमुळे वरवंडी परिसरातील ईएसडीएसच्या 24 तास संरक्षणाखालील जंगलातील झाडांची संख्या आता 35 हजारांवर पोहोचली आहे.
रामशेजचा धडा : जमिनीचे संरक्षण केले तर निसर्ग स्वतः जंगल उभे करतो
झाडांचे पुढील पाच वर्षे संरक्षण करण्याचा निर्णय ईएसडीएस साठी नवीन नाही. नाशिकजवळील रामशेज येथील 50 एकर उजाड आणि चरण्यामुळे ओस पडलेल्या जमिनीवर काम करताना कंपनीला हा महत्त्वाचा अनुभव मिळाला. ईएसडीएस ने 2011 मध्ये ही जमीन दत्तक घेतली होती. पुढील दहा वर्षांत ईएसडीएस आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मिळून येथे सुमारे 35 हजार झाडांची लागवड केली. आज त्याच ठिकाणी सुमारे 1 लाख झाडे उभी असून ती नैसर्गिकरित्या वाढलेल्या दाट जंगलाचा भाग बनली आहेत.
या जंगलातील हजारो अतिरिक्त झाडे माणसांनी लावलेली नाहीत, तर निसर्गाने स्वतः वाढवली आहेत. रामशेज आणि तुंगळदरा येथे निसर्गानेच ही हरित क्रांती घडवून आणली. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे ईएसडीएसने केलेले जमिनीचे संरक्षण. कंपनीने संपूर्ण परिसराला कुंपण घालून गुरेढोरे आणि इतर चरणाऱ्या प्राण्यांपासून त्याचे रक्षण केले. याच प्राण्यांमुळे रामशेजची जमीन अनेक दशकांपासून उजाड राहिली होती. चराईचा त्रास थांबल्यानंतर रोपे सुरक्षित वाढू लागली, पक्ष्यांनी आणलेल्या बियांपासून नवीन रोपे उगवली आणि हळूहळू जंगल स्वतःच विस्तारत गेले. आज एकेकाळी पूर्णपणे ओस पडलेली रामशेज आणि तुंगलदरा येथील जमीन दाट, स्वयंपूर्ण जंगलात रूपांतरित झाली असून येथे अनेक वन्य प्राण्यांनीही आपला अधिवास निर्माण केला आहे.
या उपक्रमाबाबत ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेडचे प्रवर्तक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. पियुष सोमानी म्हणाले, “रामशेजने आम्हाला एक महत्त्वाचा धडा दिला, जो आम्ही कधीही विसरणार नाही. आज तिथे उभ्या असलेल्या सुमारे 1 लाख झाडांपैकी आम्ही फक्त 35 हजार झाडे लावली. उर्वरित झाडे पक्षी, वारा आणि निसर्गाने स्वतः वाढवली. आम्ही फक्त गुरांचे चरणे थांबवले आणि जमिनीचे संरक्षण केले. एक दिवस झाड लावून फोटो काढणे सोपे आहे, पण जंगल उभे राहते ते वर्षानुवर्षे त्याची काळजी घेणाऱ्या लोकांमुळे, जे कोणताही कॅमेरा किंवा गर्दी नसतानाही सातत्याने आपले काम करत राहतात. म्हणूनच यावर्षी आम्ही केवळ 20 हजार झाडे लावली नाहीत, तर पुढील पाच वर्षांसाठी त्या ठिकाणी दिवस-रात्र काम करणारे कर्मचारीही नियुक्त केले आहेत. जमिनीचे संरक्षण करा, बाकीचे काम निसर्ग स्वतः करेल.”
या संकल्पनेचा भाग म्हणून ईएसडीएसने वरवंडी येथील वृक्षलागवड क्षेत्राच्या संरक्षण आणि देखभालीसाठी एक विशेष पूर्णवेळ ऑन-ग्राउंड टीम नियुक्त केली आहे. ही टीम पुढील पाच वर्षे वर्षभर 24 तास झाडांचे संरक्षण आणि देखभाल करणार आहे. ईएसडीएसच्या हरित उपक्रमांमध्ये प्रथमच अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली असून, रामशेज येथे मिळालेल्या यशस्वी अनुभवावर आधारित हा उपक्रम राबवला जात आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेडच्या पूर्णवेळ संचालिका, मुख्य विपणन अधिकारी (सीएमओ) आणि मुख्य मानव संसाधन अधिकारी (सीएचआरओ) श्रीमती कोमल सोमानी म्हणाल्या,“आमच्यासाठी प्रत्येक वृक्षलागवड मोहीम ही केवळ पर्यावरण संवर्धनाची मोहीम नसून, आमच्या कर्मचाऱ्यांना समाजासाठी मोठे योगदान देण्याची संधी आहे. आमच्या टीमने उन्हाळ्यात रोपांना पाणी दिले, रात्री त्यांचे संरक्षण केले आणि एकेकाळी उजाड असलेली जमीन हिरव्यागार जंगलात बदलताना पाहिली. पुढील पाच वर्षे या 20 हजार झाडांचे संरक्षण करण्याचा निर्णय हा दीर्घकालीन विचार आणि पर्यावरणाबद्दलची आमची बांधिलकी दर्शवतो. ईएसडीएस आणि आम्ही ज्या समुदायांसोबत काम करतो, त्या दोघांचीही ओळख शाश्वत विकासासाठी काम करणारी संस्था म्हणून निर्माण व्हावी, हीच आमची इच्छा आहे.”
Comments are closed.