
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
प्रेम, महत्त्वाकांक्षा, सत्तासंबंध आणि आत्मसन्मान यांचा वेध घेणाऱ्या ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ या नव्या ओरिजिनल सीरिजची घोषणा मराठी झी5ने केली आहे. सिद्धार्थ मेनन आणि जान्हवी उदय यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजचे दिग्दर्शन गौरव पत्की आणि निर्मिती निर्मिती क्रिएटिव्ह माइंड प्रॉडक्शन्स यांनी केले आहे. कॉर्पोरेट जगतातील नियम आणि मनातील भावनांमध्ये अडकलेल्या दोन सहकाऱ्यांची ही भावनिक कथा आहे. कामाच्या ठिकाणी फुलणारे प्रेम, त्यासोबत येणारी गुंतागुंत आणि स्वतःच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष यांची प्रभावी मांडणी या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. ही सीरिज 24 जून 2026 रोजी मराठी झी5वर प्रदर्शित होणार आहे.
‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही कथा अनन्या आणि ऋषी या दोन महत्त्वाकांक्षी तरुण प्रोफेशनल्सभोवती फिरते. कामाच्या ठिकाणी त्या दोघांची अचानकपणे ओळख होते आणि त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळते. सुरुवातीला सहज आणि नैसर्गिक वाटणारी त्यांची मैत्री हळूहळू अशा नात्यात बदलते, ज्याकडे दुर्लक्ष करणे दोघांनाही शक्य होत नाही. एकमेकांविषयीचे तीव्र आकर्षण, समान स्वप्ने आणि खोल भावनिक नाते यांमुळे ते प्रेमात पडतात. मात्र, ज्या वातावरणात प्रेमसंबंधांचे परिणाम भोगावे लागू शकतात.
कुणाच्याही नकळत एकमेकांकडे पाहणे, लांबणाऱ्या गप्पा, कॉफी ब्रेकदरम्यानचे खास क्षण आणि रात्री उशीरापर्यंत होणारे फोन हे अनन्या आणि ऋषी यांच्या आयुष्याचा भाग बनू लागतात. त्यातून दोघांमध्ये एक खास प्रमाचे नाते निर्माण होऊ लागते. या नात्यात उत्साह, आनंद तर असतोच, त्यासोबतच अनिश्चितताही असते. मात्र, त्यांचे प्रेम लपवून ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत जाते, कारण कामाच्या ठिकाणच्या अपेक्षा, व्यावसायिक मर्यादा, पदानुक्रम आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा हे घटक त्यांची परीक्षा घेऊ लागतात.
वेगवान कॉर्पोरेट जीवनशैली आणि आधुनिक आयुष्यातील ताण यांच्या पार्श्वभूमीवर घडणारी ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ गुंतागुंतीच्या प्रेमाचे रोमांच, मन मोकळे करण्यातील भावनिक असुरक्षितता आणि वैयक्तिक आनंद व व्यावसायिक जबाबदाऱ्या एकमेकांमोर उभ्या ठाकल्यावर घ्यावे लागणारे कठोर निर्णय यांचे या सीरिजमध्ये चित्र उभे करण्यात आले आहे. महत्त्वाकांक्षा, आत्मशोध आणि बंद दारांआड जपल्या जाणाऱ्या नात्याचे वास्तव यांचा सामना करताना प्रेमासाठी मोजावी लागणारी किंमत स्वीकारण्यास अनन्या आणि ऋषी तयार आहेत का, याचा विचार दोघांनाही करावा लागतो.
ट्रेलरची लिंक – https://youtu.be/BGLSakumspE?si=x41UHmrDrILg_C9E
झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर आणि मराठी झी5च्या बिझनेस हेड हेमा व्ही. आर. म्हणाल्या,“’प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’च्या माध्यमातून आजच्या व्यावसायिक जगाशी जवळून जोडलेली आणि वास्तववादी वाटणारी प्रेमकथा पडद्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही सीरिज केवळ प्रेमकथेपर्यंत मर्यादित राहत नाही, तर महत्त्वाकांक्षा, कामाच्या ठिकाणच्या मर्यादा आणि वैयक्तिक मूल्ये यांमध्ये समतोल साधण्याचे आव्हान आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आधुनिक नातेसंबंधांतील गुंतागुंत यांचाही वेध घेते. या कथेची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे तिचा प्रामाणिकपणा. अत्यंत दडपणाच्या वातावरणात प्रेम आणि करिअर यांचा समतोल साधताना अनेक तरुण व्यावसायिक ज्या द्विधा मनःस्थितीचा सामना करतात, त्याचे प्रतिबिंब या कथेत दिसते. व्यक्तिरेखांची भावनिक असुरक्षितता, त्यांनी घेतलेले तीव्र आणि कठीण निर्णय तसेच सत्तासंबंध आणि आत्मसन्मान यांभोवती उभ्या राहणाऱ्या व्यापक प्रश्नांशी प्रेक्षक निश्चितच जोडले जातील.”
दिग्दर्शक गौरव पत्की म्हणाले ,“प्रेमाला सीमा नसतात, असे आपण अनेकदा ऐकतो. मात्र, अनन्या आणि ऋषी यांच्या बाबतीत ही गोष्ट तितकी सोपी नाही. करिअर आणि नातेसंबंध या दोन्हींचा समतोल साधण्याचा प्रयत्न करणारे सहकारी म्हणून त्यांना एकत्र काम करत असताना प्रेम टिकवून ठेवणे किती आव्हानात्मक असू शकते, याची जाणीव होते. ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही वेगवान आणि आव्हानात्मक कार्यसंस्कृतीचा दबाव, शहरी जीवनातील गुंतागुंत आणि विशीतील अनिश्चितता यांचा सामना करत स्वतःचा मार्ग शोधणाऱ्या एका तरुण जोडप्याची हृदयस्पर्शी कथा आहे. प्रामाणिक, आपलेसे वाटणारे आणि आयुष्याचा उत्सव साजरा करणारे अनेक प्रसंगांनी सजलेली ही सीरिज प्रेमाच्या अपूर्ण, तरीही सुंदर अशा विविध रूपांचा गौरव करते.”
सिद्धार्थ मेनन म्हणाला,“‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही नेहमीसारखी प्रेमकथा नाही, तर जगण्याच्या ताणाखाली उमलणाऱ्या प्रेमाची कथा आहे. ऋषीची भूमिका साकारताना व्यावसायिक मर्यादा आणि वैयक्तिक भावना यांमधील ताण अनुभवण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर प्रेम आणि जवळीक यांचा अतिशय पारंपरिक, पण तरीही नव्या पद्धतीने शोध घेता आला. आजच्या कार्यसंस्कृतीशी जवळून जोडलेली ही व्यक्तिरेखा आणि ही कथा अत्यंत वास्तववादी वाटते. त्यामुळे तिच्या प्रामाणिकपणाशी प्रेक्षक निश्चितच जोडले जातील, असे मला वाटते.”
जान्हवी उदय म्हणाली,“‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’मधील अनन्याचा प्रवास आजच्या काळातील अनेक तरुण व्यावसायिकांना आपलासा वाटेल. करिअरमधील महत्त्वाकांक्षा, भावना आणि वैयक्तिक मर्यादा यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात. या प्रेमकथेचा मला सर्वाधिक आवडलेला पैलू म्हणजे अनेक आव्हानांचा सामना करत असतानाही प्रेमात असलेली दोन माणसे एकमेकांसोबत आणि एकमेकांसाठी कशी विकसित होत जातात, हे यात सुंदरपणे दाखवण्यात आले आहे. या कथेत अनेक सकारात्मक भावना आणि अनुभवांचा सुरेख मिलाफ आहे. प्रेक्षकांनी अनन्याची कथा आणि आमची कथा अनुभवावी, यासाठी मी खूप उत्सुक आहे.”
Comments are closed.