
- वेलनेस, विषमुक्त शेती आणि रोजगारनिर्मितीवर भर
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : संगमनेर (महाराष्ट्र )स्थित रियांश मल्टीट्रेड प्रा. लि. या सेलिंग क्षेत्रातील अव्वल कंपनीचा सातवा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यास देशाच्या विविध राज्यांमधून हजारो वितरक उपस्थित होते. कंपनीच्या सात वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत भविष्यातील विस्तार, नव्या उत्पादनांची निर्मिती, वेलनेस आणि विषमुक्त शेती या क्षेत्रांवर अधिक भर देण्याचा निर्धार चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मधुकर जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.
कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक (CMD) मधुकर जाधव आणि पूजा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वर्धापन दिन सोहळा पार पडला.प्रमुख अतिथी म्हणून आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच मालपाणी ग्रुपचे संजय मालपाणी हे उपस्थित होते.
यावेळी कंपनीच्या कामगिरीचा आढावा घेताना, देशभरात मोठे वितरक नेटवर्क उभे राहिल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. रियांश मल्टीट्रेडशी ३० लाखांहून अधिक वितरक जोडले गेले असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीचा दावा
रियांश मल्टीट्रेडकडून डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच आरोग्य आणि वेलनेसशी संबंधित उत्पादनांद्वारे ग्राहकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे चेअरमन जाधव यांनी नमूद केले.
‘बेरोजगाराला रोजगार आणि अनारोग्याला आरोग्य’ हे कंपनीच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. विषमुक्त शेती, नैसर्गिक जीवनशैली आणि वेलनेस या संकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने कंपनी काम करत असल्याचेही सांगण्यात आले.
Comments are closed.