NGN News
Latest Marathi News

गोकुळ गीतेंची भूमिका महायुती ऐक्याच्या मूळावर उठणार ?

  • भाजपच्या हेतूवर शिवसेनेला शंका; अवघी शक्ती माघारीसाठी खर्ची घालावी लागत असल्याची भावना

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तीन कॅबिनेट मंत्री यांनी समजूत घालूनही भाजपशी संबंधित अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे माघार घेण्यास तयार नसल्याने विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. एरव्ही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा शब्द खाली पडू न देणाऱ्या गीते कुटुंबातील व्यक्तीने एव्हढी ताठर भूमिका घेतल्याने शिवसेनेला भाजपच्या हेतूवर शंका निर्माण झाल्य्याची माहिती पुढे आली आहे. महायुतीची अवघी शक्ती प्रचाराऐवजी गीते यांच्या माघारीसाठी खर्ची पडत असल्याने शिवसेनेत नाराजी पसरली आहे. गीतेंची ही भूमिका महायुती ऐक्याच्या मूळावर उठण्याची शक्यता असून त्यामुळे भविष्यात कटुता निर्माण होणे अपरिहार्य ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

नाशिक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आल्याने भाजपमधील इच्छुक हिरमुसले झाले होते. आधी गणेश गीते यांनी बंडाचे निशाण फडकवल्यानंतर त्यांचे बंधू गोकुळ गीते हेदेखील निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून उतरले. गीते कुटुंब महाजन यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जाते. उमेदवारी न मिळाल्यामुळे दोन्ही बंधूंनी पक्षविरोधी भूमिका घेणे हा केवळ योगायोग असू शकत नसल्याची तसेच गोकुळ गीते यांना भाजप अप्रत्यक्ष पाठबळ देत असल्याची शंका शिवसेना नेतृत्वाला येत असल्याची माहिती पुढे आली आहे. गणेश गीते यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीवर महाजन यांचा मोठा प्रभाव राहिल्याचे सर्वज्ञात असल्याने त्यांनी समजूत काढूनदेखील गोकुळ गीते माघार का घेत नाहीयेत, याबाबत शिवसेना नेत्यांच्या मनात शंकेची पाल चूकचुकत आहे. निवडणूक आठ दिवसांवर येवून ठेपली असताना प्रचाराची रणनीती ठरवण्याऐवजी गीते यांच्या माघारीसाठी महायुतीची शक्ती खर्ची पडत असल्याबद्दल शिवसेनेत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

महायुतीकडे निर्णायक ४६६ मते असूनही अस्वस्थता..

नाशिक मतदारसंघात पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे १८८, शिवसेनेकडे १७१ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे १०७ मते आहेत. ही बेरीज ४६६ इतकी होत असताना आणि विजयासाठी केवळ ३१० मतांची गरज असताना महायुतीने निश्चिंत राहणे अपेक्षित असताना नेत्यांना वेगळ्याच दिव्याला सामोरे जावे लागत आहे. विरोधकांकडे केवळ १५४ इतकेच संख्याबळ असल्याने त्यांच्याकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. अशा परिस्थितीत गीते यांनी उमेदवारी कायम ठेवून निवडणूक लढल्यास भाजप-शिवसेनेत कटुता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

गीतेंच्या भूमिकेचे जळगाव कनेक्शन ?

दुसरीकडे, जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात संख्याबळाच्या आधारे सहज विजयाचा दावा करणाऱ्या भाजपची चिंता शिवसेनेतील बंडखोरीने वाढवली आहे. भाजपने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेशी संबंधित रेश्मा काळे यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी करत भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. तिथेही गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही काळे माघारी जाण्यास तयार नाहीत. याच अनुषंगाने जळगावमध्ये शिवसेना बंडखोराने माघार घेतल्यास नाशिकला गीते माघार घेतील, अशी अप्रत्यक्ष रणनीती भाजपने ठरवल्याचे बोलले जात आहे.

Comments are closed.