
- १९ हजार ५५० शेतकरी संकटात; दीपिका चव्हाण यांची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा
सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क
बागलाण तालुक्यावर अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे दुहेरी संकट कोसळताच शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या दीपिका चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत थेट शासनाला धारेवर धरले आहे. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे कांदा, मका, गहू, हरभरा, डाळींब, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.
तालुक्यातील तब्बल १४८०९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जवळपास १९ हजार ५५० शेतकरी या संकटात सापडले आहेत. या भीषण परिस्थितीची तात्काळ दखल घेत दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत बळीराजाच्या वेदना थेट शासनापर्यंत पोहोचवल्या.
शेतकऱ्यांनी कर्ज काढून, प्रचंड खर्च करून उभी केलेली पिके काही तासांत उद्ध्वस्त झाली. आता केवळ सहानुभूती नव्हे, तर तातडीची आणि ठोस आर्थिक मदत आवश्यक आहे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. त्यांनी तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई जाहीर करावी तसेच विशेष आर्थिक मदत पॅकेज जाहीर करण्याची जोरदार मागणी केली आहे.
पिंपळकोठे, दरेगाव, ताहाराबाद, मुल्हेर, दसवेल, भिलवाड, तुंगण दिगर, कातरवेल, माळीवाडे, बिजोरसे, इजमाने, मळगाव (भा.), आराई, सटाणा, फोपीर, मुंजवाड, ब्राह्मणगाव, औंदाणे, तळवाडे, भामेर, बहिराणे, टेंभे, पिंपळदर, अजमेर, सौंदाणे, पिंगळवाडे, काकडगाव, चौगाव, सारदे, मूळाने, भाक्षी, लखमापूर, ठेंगोडा, मोराणे सांडस, चौंधाणे, वायगाव, सुराणे, मळगाव तिळवण, मोरेनगर, रातीर, कर्हे, नामपूर आदी गावांमध्ये गारपिटीसह झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
काढणीच्या उंबरठ्यावर असलेली रब्बी पिके आडवी पडली असून कांदा, डाळिंब, द्राक्ष, गहू, हरभरा, मका व भाजीपाला पिकांना जबर फटका बसला आहे. द्राक्षबागांतील घड तुटून पडले असून डाळिंबात फळगळ वाढली आहे. कांद्याचे पीक सडण्याच्या मार्गावर असून साठवणुकीतील कांदाही धोक्यात आहे. गहू व मका जमिनीवर कोसळल्याने उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर दीपिका चव्हाण यांनी प्रशासनालाही स्पष्ट शब्दांत सुनावले असून, पंचनाम्यात विलंब सहन केला जाणार नाही. तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा. अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीही या परिस्थितीची दखल घेत लवकरच पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
Comments are closed.