सरकारच्या गैरकारभाराच्या झळा शेतकऱ्यांना नको…
येवला : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्व प्रकारचे थकीत कर्ज 100% माफ करावे, या मागणीसाठी येवला येथे 15 ऑगस्ट रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकरी “कर्ज न फेडण्याची” आणि “आत्महत्या न करण्याची” सार्वजनिक शपथ घेणार आहेत.
900 दिवसांपासून आंदोलन सुरू
जिल्हा बँकेविरुद्ध नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 900 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. 20 लाख शेतकरी असलेल्या जिल्ह्यातील केवळ काहीच कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होत असल्याची खंत आयोजकांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील 54 हजार शेतकऱ्यांवर कारवाई झाली असून, अनेकांच्या जमिनी जप्त झाल्या आहेत.
8040 शेतकरी कर्ज फेडण्यास असमर्थ
येवला तालुक्यातील तब्बल 8040 शेतकरी कोणत्याही समोपचार योजनेतही कर्ज फेडण्यास असमर्थ आहेत. “3 लाख कर्ज असताना फेडू शकलो नाही, आता 12 ते 20 लाख कुठून भरायचे?” असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
जाहीर इशारा
बँकेने यापुढे कोणतीही जप्ती, लिलाव, किंवा 7/12 वर मालकी हक्काची नोंद करू नये, असा इशारा देण्यात आला आहे. “जर अशा कारवाईमुळे एखाद्या कर्जदार शेतकऱ्याने आत्महत्या केली, तर पूर्ण जबाबदारी बँक व शासनाची राहील,” असे आयोजक भागवतराव सोनवणे यांनी सांगितले.
शपथ विधी
या कार्यक्रमात शेतकरी “कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करणार नाही” अशी सार्वजनिक शपथ भारताच्या राष्ट्रध्वजाला साक्षी ठेवून घेतील. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्री. विठ्ठल राजे पवार, अध्यक्ष व राष्ट्रीय निमंत्रक, शरदजोशी विचारमंच – शेतकरी संघटना महासंघ, एम. एस. फाऊंडेशन, तसेच 900 दिवस धरणे आंदोलन करणारे राज्य शेतकरी समन्वय समिती अध्यक्ष भगवान बोराडे करणार आहेत अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक आयोजक आणि कर्ज मुक्त शेतकरी अभियानाचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी दिली आहे.
——————————–
“देशातील उद्योजकांनी 16 लाख कोटी रुपये बुडवले, त्यांच्या वर कारवाई झाली नाहीं, जिल्हा बँकेची कलम 88 नुसार चौकशी होऊन संचालक मंडळ तसेच संस्थात्मक कर्जवसुली झाली नाही. नेत्यांचे साखर कारखाने आणि उद्योग यांना नियम बाह्य कर्ज वाटप करुन त्यांना व्याजासह मुद्दालात 50 % सूट दिली… शेतकऱ्यांवर मात्र लिलावाची कारवाई केली, आता आम्ही जिल्हा बँकेचे काहीच देणे लागत नाहीं, इतरांची 100 % वसुली झालेली दाखवा मग पुढचा विचार करू. आता जिल्हा बँक बुडाली तरच शेतकरी जगेल, रिझर्व बँकेने जिल्हा बँकेचा बँकिंग परवाना रद्द करावा यासाठीच आता आंदोलन करू.. पुढचे आंदोलन दिल्लीत अमित शहा यांच्या दरबारात होईल.
भागवतराव सोनवणे, संयोजक, कर्ज मुक्त शेतकरी अभियान
Comments are closed.