NGN News
Latest Marathi News

अपेक्षांचा कुंभ पूर्ततेच्या अमृतानुभवाने ओसंडवा ! ( सारीपाट/मिलिंद सजगुरे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क

‘अंत भला तर सर्व भले’ ( All is well that ends well ) .. आशावाद, संयम आणि प्रयत्नशीलता यांचा संगम साधणाऱ्या या उक्तीची यथोचित प्रचीती नाशिकमध्ये भाजपने महापालिका सफाईदारपणे जिंकण्यातून आली म्हणायची. ‘शंभर प्लस’चा नारा.. मोठ्या स्वरूपातील ‘इनकमिंग’ला तेवढ्याच मोठ्या मतभेदांची झालेली दृष्ट.. राज्याच्या सत्तेतील सवंगड्यांना अव्हेरले जाणे.. तिकीट वाटपातील प्रचंड घोळ.. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी.. नव्या-जुन्यांतील मनभेद.. अशा वाद-विवादाच्या हिंदोळ्यावर झुललेली महापालिका निवडणूक भाजपने एकहाती खिशात घातली. वस्तुतः, नाशकात प्रबळ विरोधकच नसल्याने सवंगड्यांशीच दोन हात करत भाजपने ही किमया साधली. निकालानंतरची समीकरणे पाहता व्यापक दृष्टीकोन ठेवला असता तर भाजपला सवंगड्यांसह दोन तृतियांश बहुमत सहजगत्या मिळवता आले असते. तथापि, शिन्देसेना आणि दादांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा आम्ही सर्वार्थाने सरस असल्याच्या भावनेने भाजप मैदानात उतरला आणि जिंकलाही !

‘शंभर प्लस’ पर्यंत जाता आले नसले तरी जागांची सत्तरी पार करून नाशिकमध्ये भाजप ‘धुरंधर’ ठरला. एरव्ही ‘संकटमोचक’ ठरणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या आग्रही ‘इनकमिंग’ आणि तपोवनातील वृक्षतोडीच्या भूमिकांमुळे पक्षासाठी किमान नाशकात नवे संकट उभे करतात का, असे वातावरण तयार झाले होते. कारण, खांद्यावर पक्षाचा गमछा टाकले गेलेले बव्हंशी चेहरे वादग्रस्त पार्श्वभूमीचे होते. त्यावरून थेट स्थानिक महिला आमदारद्वय महाजन यांच्याशी असहमत होते. मात्र, पक्षविस्ताराचा मुलामा देत वेळ मारून देण्यात आली. सुदैवाने, त्यातील बरेच चेहरे विजयपथावर पोहचल्याने महाजन यांना निवडणूकपश्चात होऊ शकणारी टीका टाळता आली. तपोवानाचे मूळ स्वरूप बदलून तिथे कृत्रिम बांधकाम करण्याचा निर्णय जन रेट्यामुळे मागे घ्यावा लागला. अर्थात, निवडणूक निकालाचा मतितार्थ काढताना भाजपला मिळालेले अभूतपूर्व यश केवळ राज्याचे मुखिया देवेंद्र फडणवीस श्रेयीत असल्याचे म्हणता येईल. त्यांच्या विकासाच्या भाषेला नाशिककरांनी पुन:श्च दिलेला तो प्रतिसाद ठरला. गोदाघाटाच्या साक्षीने नाशिककरांच्या अपेक्षांचा कुंभ पूर्ततेच्या प्रत्यक्ष अमृतानुभवाने ओसंडून वाहण्याची त्यांची ग्वाही परिणामकारक ठरली. शिवाय, उद्यमनगरीला पन्नास हजार कोटीच्या गुंतवणुकीचे प्रस्तावित कोंदण देखील जनतेला भावले.

आठ वर्षांपूर्वी नाशिककरांचा कौल मागताना शहर ‘दत्तक’ घेण्याची तेव्हाही मुखिया पदावर असलेल्या फडणवीस यांची घोषणा शहरवासीयांच्या हृदयी वसली होती. सत्ता आल्यानंतर स्थानिकांच्या पदरात नेमके काय पडले, हा संशोधनाचा विषय ठरला. तथापि, राजकीय संक्रमणात दोनच वर्षांत सत्तेवरून पायउतार होण्याच्या अपरिहार्यतेची ढाल त्यासाठी पुढे करण्यात आली. आता मात्र यत्र-तत्र-सर्वत्र सत्ता असल्याने नाशिककरांनी पुन्हा एकदा महापालिकेची सूत्रे भाजपकडे दिली आहेत. स्वाभाविकच, स्थानिक नेत्यांसह पक्ष लोकप्रतिनिधींना आश्वासनपूर्तीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करावा लागेल. कारण प्राप्त अधिकाराच्या नाण्याची जबाबदारी ही दुसरी बाजू असते. कुंभमेळ्यातील कामे आणि त्यांची गुणवत्ता हा भाजपच्या वचननाम्याचा ‘ट्रेलर’ असेल. त्यानंतरच्या काळात नाशिकला अजून विकसित कसे करता येईल, यासाठी सत्ताधाऱ्यांची कसोटी असेल. राजकीय अंगाने बोलायचे तर चमत्कार वारंवार होत नाहीत आणि जनतेला सातत्याने गृहीत धरणे देखील अंगलट येते, या सत्याचे शहर कारभारी विस्मरण होऊ देणार नाहीत, अशी अपेक्षा !

सारांशात, निवडणूकपूर्व काळात जनतेतील ‘रव’ आणि पक्षांतर्गत कलकलाट या गोष्टी सुलक्षणी नसूनही भाजपला मिळालेले यश नजरेत भरण्याजोगे आहे. समोर पर्याय दिसत असूनही केवळ विश्वासार्हतेच्या मुद्द्यावर नाशिककरांनी भाजपला कौल दिला आहे. मोठ्या यशाला उन्मादाचा दर्प नको, या मुखीयांच्या उक्तीला स्थानिक भाजपेयी अव्हेरणार नाहीत, ही पौरांची रास्त अपेक्षा राहील. प्रचाराच्या काळात मानमरातब बाजूला ठेवून मतदारांचा चरणस्पर्श करणारे ही भावनिक बांधिलकी कायमस्वरूपी जपतील, हीदेखील माफक अपेक्षा राखल्यास ती अनाठायी नाही. राज्यात भले सत्तासंगत असेल, पण स्थानिक स्तरावर सक्षम विरोधक म्हणून शिन्देसेनेची ‘वॉचडॉग’ म्हणून भूमिका पार पाडण्याची जबाबदारी असेल. प्रशासकीय निर्णयातून जन अवहेलना होत असेल तर सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्याची मानसिकता त्यांनी ठेवणे अपेक्षित असेल. तूर्तास, ‘उतू नका, मातु नका.. घेतला वसा टाकू नका..’ हीच आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून अपेक्षा ठेवू यात..

विरोधकांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह !

महापालिका निवडणूक विविध अंगांनी चर्चेत राहिली, तशी ती विरोधकांच्या नकारात्मक मानसिकतेसाठीही स्मरणात राहील. शिवसेना उबाठा आणि मनसे साठी ठाकरे बंधूंची सभा सोडता इतर विरोधक गलितगात्र असल्याचे आढळून आले. विशेषतः, दादा आणि साहेबांच्या आधिपत्याखालील राष्ट्रवादी, फादर कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांनी अपवादात्मकता सोडल्यास सत्ताधाऱ्यांचा विजय गृहीत धरून निवडणूकपूर्व ‘बाय’ दिला दिला की काय अशी स्थिती दिसून आली. कोणत्याही बड्या नेत्याने ना सभा, ना मेळावे घेवून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणे शक्य झाले नाही. उलटपक्षी, भाजप आणि शिन्देसेना सत्तेत असूनही त्यांनी प्रचारात सातत्य ठेवत जनतेपर्यंत पोहोचण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. विरोधकांना काही प्रभागांत उमेदवार मिळाले नाहीत. प्रचारातही दोन-चार डोकी सोडली तर कार्यकर्त्यांची वानवा जाणवली. या सगळ्या बाबी आर्थिक गणितावर अवलंबून असल्या तरी हा अनुत्साह स्वकीयांना निद्रिस्त करणारा आणि प्रतिस्पर्ध्यांसाठी उत्साहदायी ठरतो. भविष्यात, हे सारे जनतेला अपेक्षित नाही, एव्हढेच !

Comments are closed.