केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून सोशल मीडियावरून घोषणा
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक शहराच्या श्वासात अडथळा ठरणाऱ्या द्वारका चौकाच्या वाहतूक कोंडीवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. आगामी कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या द्वारका चौक सुधार प्रकल्पाला २१४ कोटी रुपयांची केंद्रीय मंजुरी मिळाली असून, हा निर्णय म्हणजे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा थेट परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः सोशल मीडियावरून या निर्णयाची घोषणा करत, नाशिक शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी द्वारका चौकाच्या सुधारणेस मंजुरी देण्यात आल्याचे जाहीर केले. ही घोषणा म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांच्या जखमेवर ठेवलेला मलम ठरला आहे.
एक चौक, अनेक प्रश्न… आणि सातत्याचा संघर्ष द्वारका चौक हा नाशिकमधील केवळ एक वाहतूक चौक नसून, मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्ग, नाशिक रोड, पंचवटी, शहराचा मध्यभाग आणि औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा हा मुख्य श्वासमार्ग आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांची प्रचंड संख्या आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे हा चौक कायमस्वरूपी कोंडीचे प्रतीक बनला होता. याच पार्श्वभूमीवर खासदार राजाभाऊ वाजे यांनी सिग्नल-फ्री वाहतूक, भुयारी मार्ग (अंडरपास), वापरात नसलेल्या पादचारी सबवेचे वाहन अंडरपासमध्ये रूपांतर, कुंभमेळ्यासाठी दीर्घकालीन वाहतूक आराखडा या मागण्यांसाठी वेगवेगळ्या टप्प्यांत सातत्याने पत्रव्यवहार, तांत्रिक मांडणी आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत प्रत्यक्ष भेटी घेतल्या. अनेकदा दुर्लक्षित राहणारा हा प्रश्न त्यांनी केंद्र सरकारच्या अजेंड्यावर ठामपणे आणला.
२०२७ मध्ये नाशिकमध्ये होणारा कुंभमेळा हा केवळ धार्मिक नव्हे, तर प्रशासनिक आणि पायाभूत सुविधांची कसोटी असणार आहे. कोट्यवधी भाविक, वाहनांची प्रचंड गर्दी आणि मालवाहतुकीचा ताण लक्षात घेता, द्वारका चौकाचा प्रश्न सोडवणे अपरिहार्य होते. अखेर केंद्र सरकारने या वास्तवाची दखल घेत, २१४ कोटींच्या भरीव तरतुदीसह प्रकल्पास मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होईल, सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम बनेल आणि मालवाहतुकीचा वेळ व खर्च कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नाशिकसाठी केवळ प्रकल्प नव्हे, तर दिशादर्शक निर्णय द्वारका चौक प्रकल्प ही केवळ एक विकास योजना नसून, नाशिक शहराच्या भविष्यातील नियोजनाची दिशा ठरवणारा निर्णय मानला जात आहे. धार्मिक, औद्योगिक आणि कृषी केंद्र असलेल्या नाशिकसाठी हा प्रकल्प ‘गेम चेंजर’ ठरणार आहे. पाठपुरावा म्हणजेच परिणाम “नाशिकसाठी तात्पुरते उपाय नव्हे, तर शाश्वत आणि दीर्घकालीन उपाय हवेत,” ही भूमिका खासदार राजाभाऊ वाजे यांनी सातत्याने मांडली. आज केंद्र सरकारकडून मिळालेली मंजुरी म्हणजे त्या भूमिकेचीच ठोस पावती आहे. द्वारका चौकाच्या प्रश्नावर मिळालेले हे यश नाशिककरांसाठी दिलासादायक तर लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे जिवंत उदाहरण ठरणारे आहे.
——-
@ निवडून आल्यापासून माझ्या अजेंड्यावर असलेला हा प्रश्न मार्गी लागतोय याचा आनंद आहे. नितीनजी गडकरी याबाबत सकारात्मक होतेच, थोडा उशीर झाला असला तरी प्रकल्प होतोय हे महत्वाचे. बाकी फक्त द्वारका चौकाचा प्रश्न मिटतोय म्हणून मी समाधानी नाही, द्वारका ते नाशिकरोड उड्डाणपुलासाठी देखील संघर्ष सुरूच राहील.
: राजाभाऊ वाजे, खासदार नाशिक
Comments are closed.