- सहा महिने लांबलेल्या पावसाचा फटका; आतापर्यंत सुमारे ४२०२ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात
** राकेश बोरा
लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क
सहा महिने सतत सुरू राहिलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनाला मोठा फटका बसला असून, त्याचा थेट परिणाम द्राक्ष निर्यातीवर झाला आहे. यंदा द्राक्ष उत्पादनात तब्बल ५० टक्क्यांहून अधिक घट झाल्याने नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात संथ गतीने सुरू आहे.
युरोपमधील नेदरलँड व जर्मनी या देशांकडे आतापर्यंत ३१३ कंटेनरमधून सुमारे ४२०२ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली आहे. वैशिष्ट्यपूर्ण चव, उत्कृष्ट गुणवत्ता आणि जागतिक दर्जाच्या निकषांमुळे नाशिकच्या द्राक्षांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली उपस्थिती अधोरेखित केली आहे.मात्र निर्यातीचे प्रमाण अगदी नगण्य असल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे
द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळवून देणारे महत्त्वाचे फळ आहे. सन २०२४-२५ या हंगामात देशातून २ लाख ७१ हजार २५३ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली असून त्यातून सुमारे ३ हजार ५० कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले होते. मात्र यंदाचा हंगाम द्राक्ष उत्पादकांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरला आहे. सलग सहा महिने झालेल्या पावसामुळे जवळपास ५० टक्क्यांहून अधिक द्राक्ष बागा बाधित झाल्या आहेत. उत्पादन घटल्याने अनेक शेतकरी स्थानिक बाजारपेठेतच द्राक्ष विक्रीला प्राधान्य देत असल्याने निर्यातीवर त्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे.
यंदा महाराष्ट्रातून ३० हजार ४६० द्राक्ष बागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली असून, कर्नाटकातून ९ द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात आली आहे. वाढती जागतिक मागणी लक्षात घेता द्राक्ष निर्यातीसाठी केंद्र सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी शेतकरी व निर्यातदारांकडून होत आहे. वाहतूक खर्चात सवलत, ड्युटीमध्ये दिलासा आणि नव्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घेतल्यास भारतीय द्राक्ष निर्यातीला मोठा वाव मिळू शकतो, असे मत निर्यातदार व्यक्त करत आहेत.
हवामानातील सातत्याने होणारे बदल, वाढता उत्पादन खर्च आणि मजूर टंचाई या अडचणींवर मात करत नाशिकमधील द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीची परंपरा कायम ठेवली आहे. गोड चव आणि दर्जाच्या बळावर नाशिकच्या द्राक्षांनी जागतिक बाजारपेठेत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
प्रतिक्रिया -1
सुनील गवळी द्राक्ष उत्पादक, ब्राह्मणगाव विंचूर
यंदा सहा महिने सतत पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. उत्पादन जवळपास निम्म्यावर आले आहे. खर्च मात्र तसाच वाढलेला आहे.
प्रतिक्रिया-२
कैलास भोसले अध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघ
यंदा बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट होण्याची शक्यता असून, त्याचा थेट आणि गंभीर परिणाम द्राक्ष निर्यातीवर होत आहे.
प्रतिक्रिया ३ – सचिन होळकर, कृषी तज्ञ,लासलगाव
द्राक्ष निर्यातीवर विपरीत परिणाम होईल…
यावर्षी द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता याचा परिणाम निर्यातीवर सुद्धा होत आहे. सद्य परिस्थितीमध्ये लोकल द्राक्षांचे दर खूप चांगले असल्याने शेतकरी फारसा निर्यात करण्यामध्ये उत्सुक नाही. फेब्रुवारी महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात चांगल्या प्रकारे सुरू होईल मात्र लोकल द्राक्षांचे दर चांगले राहिल्यास ती देखील निर्यात घटन्याची शक्यता आहे. बाहेरच्या देशांमधून द्राक्षांना मोठी मागणी आहे मात्र यावर्षी मागणीप्रमाणे पुरवठा होईल अशी शक्यता वाटत नाही. एकंदरच द्राक्षाच्या पूर्ण विक्री व्यवस्थेवर उत्पादन घटीचा परिणाम होणार आहे. द्राक्षाचे दर जरी चांगले मिळत असते तरी शेतकऱ्यांना खूप पैसे होतील असे म्हणता येणार नाही कारण मुळात शेतकऱ्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेले आहे.
देशातील द्राक्ष निर्यात आलेख
२०१७-१८ -१८८२२१ मॅट्रिक टन- १९०० करोड
२०१८-१९ -२४६१३३ मॅट्रिक टन- २३३५ करोड
२०१९-२० -१९३६९० मॅट्रिक टन- २१७७ करोड
२०२०-२१ – २४६१०७ मॅट्रिक टन- २२९८ करोड
२०२१-२२ – २६३०७५ मॅट्रिक टन- २३०२ करोड
२०२२-२३ – २६७९५० मॅट्रिक टन- २५४३ करोड
२०२३-२४ – ३४३९८२ मॅट्रिक टन- ३४६० करोड
२०२४-२५ – २७१२५३ मॅट्रिक टन- ३०५० करोड
Comments are closed.