मुंबई/एनजीएन नेटवर्क
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 12500 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कल्याणमधील मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी हा जाहीर गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या घोटाळ्याची SIT चौकशी करणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात साडेबारा हजार कोटींची घोटाळा झाल्याचे कॅगच्या रिपोर्टमध्ये उघड झाले आहे . देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधील जाहीर सभेत भाषण करताना या घोटाळ्याबाबत गौप्यस्फोट केला. SIT मार्फत चौकशी करत यामाध्यमातून जो जनतेचा पैसा तुम्ही तुमच्या तिजोरीत नेला आहे,तो पैसे परत आणण्याच काम आमचं सरकार करेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विविध कामांमध्ये अनियमितता
मुंबई महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर 2019 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामांमध्ये रुपये 12 हजार 24 कोटी इतक्या रकमेची अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग) ने विशेष लेखापरिक्षा अहवालामध्ये निदर्शनास आणून दिले आहे. यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अपहाराचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करून संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याबाबत निवेदन दिले होते. यासंदर्भात स्थापन करण्यात येणाऱ्या विशेष चौकशी समितीत आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.