(भावनांचं भांडवल करणाऱ्या समाजात स्त्रीच्या तुटलेल्या मनाची कहाणी)
रतन टाटा पाय जमिनीवर असलेलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व. व्यवसायात शिखरावर असणारे रतन टाटा हे अविवाहित होते त्यांनी एकदा बोलताना त्यांच्या जीवनातील काही नाजूक पान उघडली होती. ते जेव्हा अमेरिकेत काम करत होते तेव्हा ते प्रेमात पडले होते. आणि ते त्या नात्यात सिरीयस देखील होते. त्यानंतर ते भारतात परत आले.आणि म्हणून आमचं लग्न झालं नाही असं ते सांगतात. काही कारणास्तव त्यांचं तिच्याबरोबर लग्न झालं नाही. रतन टाटांनी नंतर मग टाटा ग्रुप पुढे नेण्यासाठी काम सुरू केलं. आणि शेवटपर्यंत अविवाहित राहिले जिच्यावर प्रेम केलं तिच्यासोबत लग्न नाही झालं.तर रतन टाटांनी परत कुणाशीही विवाह केला नाही. भारताच्या उद्योगांना नवी दिशा देणारे, समाजासाठी नेहमीच एक आदर्श असलेले रतन टाटा. त्यांनी हा पण एक आदर्श ठेवलेला आहे नाही का! यशाच्या शिखरावर असताना सुद्धा एका स्त्रीच्या प्रेमात पडल्यानंतर परत लग्नच केलं नाही.
अजून एक महान व्यक्तिमत्व, देशाची राज्यघटना आपल्या पदरात टाकणारे ,बुद्धी सम्राट, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या आयुष्यातील असाच एक कोमल प्रसंग पेंगुईन मधून प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकात गेल ओमवेट सांगते की, बाबासाहेब ज्या वेळेला पीएचडी करण्यासाठी लंडनमध्ये गेलेले होते त्यावेळेला बाबासाहेब एका बोर्डिंग मध्ये राहत होते. आणि ती बोर्डिंग चालवणारी जी महिला होती तिची मुलगी होती फेनी फिटजेराल. जी इंडिया ऑफिसमध्ये काम करत होती.आणि तेथे काम करत असताना फेनी बाबासाहेबांना वेगवेगळे विषयांची पुस्तकं उपलब्ध करून देत होती. बाबासाहेब भारतात जेव्हा परत आले त्यानंतर त्यांची सगळी पुस्तकं तिने सांभाळून ठेवली होती. गेल ओमवेट ही तिच्या पुस्तकात लिहिते की, फेनीच बाबासाहेबांवर खूप प्रेम होतं. बाबासाहेबांना जेव्हा हे कळलं त्यावेळेला त्यांनी तिला स्पष्ट भाषेत समजावून सांगितलं की, मी हे करू शकत नाही, मी तुला कधीच न्याय देऊ शकत नाही कारण मी विवाहित आहे. आणि मला माझ्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून मी इकडे शिकायला आलेलो आहे. बाबासाहेबांनी फेनीला नेहमी फक्त एका मैत्रिणीसारखंच बघितल.
रतन टाटांनी जिच्यावर प्रेम केलं तिने लग्नाला नकार दिल्यानंतर दुसरं कुणाशी लग्न केलं नाही. इकडे बाबासाहेबांनी फेनीला स्पष्ट भाषेत,आणि प्रेमात नकार दिला.
असे महान व्यक्ती आपल्या भारतातीलच ना? अजूनही कितीतरी असे महान पुरूष या जगात आहेत. पण मग मी एक समुपदेशक म्हणून काम करत असताना सध्या ज्या काही केसेस माझ्याकडे सुरू आहेत. ज्यांच्यावर मी काम करते आहे. त्या काही वेगळ्याच आहेत.अगदी मन हेलावून टाकणाऱ्या !!!
हा लेख एक भावनिक पातळीवर भिडणारा, समाजाला प्रश्न विचारणारा आणि स्त्रीच्या भावना, दु:ख, अन्याय या सगळ्यांना आवाज देणारा आहे.
ती विश्वास ठेवत राहिली… आणि तो खोटं बोलत राहिला.
ती भविष्याचं स्वप्न पाहत राहिली… आणि तो आपली सोय बघत राहिला.
माझ्याकडे आलेली एक स्त्री.
अनघा – एक संवेदनशील, शिक्षित स्त्री.तुटलेल्या, विखुरलेल्या अवस्थेत, डोळ्यात अश्रूंचा पूर घेऊन समुपदेशनासाठी माझ्यासमोर बसलेली.मागील 5 वर्षांपासून ती विजयसोबत रिलेशनशिपमध्ये होती. विजय तिच्या आयुष्यात प्रकाशासारखा आला होता. त्याचे प्रत्येक शब्द प्रेमळ होते, “मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो, “तुझ्याशिवाय आयुष्य अशक्य आहे,तू नसशील तर मी वेडा होईल,तू नसशील तर पैसा,यश अगदी कशालाच किंमत नाही.”अशा अनेक शब्दांवर विश्वास ठेवून अनघा त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती.तिचा एकही दिवस त्याच्याशी बोलल्याशिवाय किंवा भेटल्याशिवाय जात नव्हता.भारावून गेलेली होती जणू.पण एक दिवस, अचानक, विजय म्हणतो – ” मी बाप झालो!”आणि हे बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही अपराधी भाव नव्हता. फक्त आनंद, जबाबदारी हे भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.तिला काय वाटेल? तिच्यावर काय परिणाम होईल? आपण तिच्यासोबत किती आणाभाका घेतल्या. याचा तीळभर सुद्धा विचार त्याच्या मनात आलेला नव्हता.
त्या क्षणाला अनघाच्या पायाखालची जमीन सरकली. तिचं प्रेम, तिचा विश्वास, तिचं भविष्य – सगळं एकदम कोसळलं.या क्षणाला मी काय करायला पाहिजे?जगावे की मरावे? या विचारातच ती अश्रूंमध्ये पूर्ती बुडाली होती.ज्या व्यक्तीसोबत आयुष्याची स्वप्न पाहिली ही तीच व्यक्ती आहे का? तिचा विश्वासच बसत नव्हता.जणू काही सगळे संपले होते. अशा अवस्थेत ती फक्त आणि फक्त आक्रोश करून रडत होती. अनघा पूर्णपणे एकटी पडलेली होती. कारण ती ना कुणाला सांगू शकत होती, ना कुणाला विचारू शकत होती, ना कुणाची मदत घेऊ शकत होती. कारण आपला समाज याकडे कशा पद्धतीने बघेल? मला कुणीही मदत करणार नाही? मलाच दोष लावले जातील. अशा अनेक विचारांनी ती स्वतः एकटीच झुंजत होती.
दुसरी केस जिच्यावर मी काम करते आहे ती आहे स्मिताची.
स्मिता – २८ वर्षांची तरुणी, एक विधवा. तिचा पाच वर्षांचा मुलगा आहे. तिनं आयुष्याला दुसरी संधी द्यायचं ठरवलं. एक विवाहित पण घटस्फोटाच्या प्रक्रियेत असलेला पुरुष तिच्या आयुष्यात आला. त्यानं प्रेम केलं, आश्वासन दिलं, आणाभाका घेतल्या… आणि स्मिताने पुन्हा एकदा कोणावर तरी मनापासून विश्वास ठेवला.पण ती जेव्हा जेव्हा त्याला लग्नासाठी बोलू लागली त्या वेळेला त्याच्याकडे एक कारण होतं. ते असं की, माझा घटस्फोट पूर्ण होऊ दे.आणि मग घरच्यांच्या संमतीने आपण लग्न करू. आणि तीही ते ऐकून शांत बसत होती. तिच्या मनात एक भाव होता. तो असा की. त्याला त्याच्या या वाईट प्रसंगात सपोर्ट करायचा होता.खूप जीव लावला तिनं.काळजी घेतली.नंतर तिला बाहेरून कळलं की, त्या पुरुषाचा डिवोर्स झाला आणि तो दुसऱ्या मुली सोबत लग्न करून मोकळा पण झाला होता.स्मिता आतून पूर्ण पणे तुटली होती.हे खोटं असाव अस तिला वाटत होतं.आंधळ्या प्रेमात पोटी परत परत त्याला लग्नाबद्दल विचारत होती. तिला कळल्याचं त्याला सांगितलं नाही. आणि त्याचे उत्तर काय येते हे ती बघत होती.
स्मिता अजूनही विचारत होती – “कधी लग्न करायचं?” आणि तो अजूनही खोट्या अपेक्षांच्या फुग्यात हवा भरत होता.
आता ती पूर्णपणे तुटलेली, विखुरलेली,तो धोका सहन न होणारी माझ्या पुढे येऊन बसली. सतत एकच बोलत होती की, मला तो असा फसवू कसा शकतो? मी या समाजात एक विधवा म्हणून वापरते म्हणून मला काहीच किंमत नाही? माझ्या भावनांना, माझ्या चारित्र्याला, माझ्या स्वाभिमानाला, माझ्या सेल्फ रिस्पेक्टला, काहीच किंमत नसावी त्याच्या नजरेत? ती स्वतःलाच कोसत होती की, मी अशा पुरुषावर विश्वास का ठेवला? स्वतःला मारून घेत होती, स्वतःचेच केस ओढत होती. तिची अवस्था बघून माझे मन अस्वस्थ झाले होते.
एकच विचार मनात घोळत होता की. “हे प्रेम आहे की भावनांचा व्यापार?”
या कथा केवळ दोन स्त्रियांंच्या नाहीत.
या हजारो, लाखो स्त्रियांंच्या आहेत. ज्या प्रेम देतात, समर्पण करतात, पण त्यांचं प्रेम फक्त गरज संपेपर्यंतच उपयोगात आणलं जातं.
प्रेमाच्या नावाखाली फसवणूक, भावनांचं शोषण, आणि आत्म्याचं विघटन होत आहे.
समुपदेशक म्हणून माझ्याकडे दरवर्षी अनेक अशा केसेस येतात.
स्त्रीचं मन हे एक कोमल, समर्पित आणि पूर्ण विश्वासू असतं. पण जेव्हा तिच्या भावना खेळण्यापुरत्या मानल्या जातात, तेव्हा तिच्या आत्म्याचा तुकडा तुकडा होतो.
ती बाहेरून हसते, पण आतून दररोज तुटत राहते.
या अवस्थेत अनेक स्त्रिया भावनिक आघात, नैराश्य, झोपेच्या समस्या, आत्महत्येचे विचार, व एकाकीपणाच्या गर्तेत अडकतात. अनेक स्त्रिया भयावह अशा मानसिक आजाराला बळी पडतात.याला जबाबदार कोण?
तर समाजाचा दुटप्पी दृष्टिकोन.
आजही आपण म्हणतो, “स्त्री स्वतंत्र आहे.”
पण जेव्हा ती रिलेशनशिपमध्ये असते, तेव्हा तिला “काय गरज होती?”, “तीच मूर्ख होती”, असे बोलले जाते.
पण खरा प्रश्न हा आहे-
“का पुरुषाने तिच्या भावनांशी खेळ केला?”
“का कोणताही कायदा अशा भावनिक फसवणुकीसाठी शिक्षा देत नाही?”
स्त्रीवरच प्रश्न का? पुरुषाला उत्तरदायित्व का नाही?
अशा अमानवी कृत्य करणाऱ्याला शिक्षा मिळेल का?
या पुरुषांनी दिलेली आश्वासने – तीही एक जबाबदारी नाही का?
भावनिक फसवणूक ही केवळ मन तोडत नाही, ती व्यक्ती तोडते.
म्हणूनच भावनिक अत्याचारालाही कायद्याची गरज आहे.
आज वेळ आली आहे की समाजात एक सशक्त चर्चा सुरू व्हावी – जिथे स्त्रीचं प्रेमही मूल्यवान मानलं जाईल, आणि तिच्या भावनांशी खेळ करणाऱ्यांना सामजिक आणि कायदेशीर जबाबदारीने तोंड द्यावं
याच तुटलेल्या स्त्रियांमध्ये एक अपार ताकदही असते – पुन्हा उभं राहण्याची.
माझं सर्व स्त्रियांना आवाहन आहे – तुम्ही दोषी नाही.
तुमच्या प्रेमावर कुणी खेळ केला, याचा अर्थ तुम्ही चुकीच्या नाहीत.
तुमचं मन निरागस, निखळ आणि प्रेमळ आहे – आणि तेच तुमचं सामर्थ्य आहे.
समाजाला एकच सांगावेसे वाटेल दृष्टिकोन बदला, तिला खरं स्वातंत्र्य द्या. तिच्या बाजूने उभे रहा, तिला समजून घ्या,तिला जपा.तिला पाठिंबा द्या.
स्त्री जेव्हा प्रेम करते, ती आयुष्य उधळते.
पण कोणी तिचं मन तोडल्यावर, तिला दोष देऊ नका – तिला समजून घ्या.
तिच्या भावनांचं समर्थन करा, तिच्या वेदनांना फुंकर घाला.
आणि शेवटच सांगते अशा धोका देणाऱ्या पुरुषांचा स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी सुद्धा धिक्कार केला पाहिजे. कारण असा पुरुष तुमच्या बहिणीच्या मुलीच्या आयुष्यात आला तर………. विचार करा.
लेखिका: डॉ. प्रमिला पवार, मानसोपचार तज्ञ,समुपदेशक.
(स्त्रीभावना समजून घेणारी एक संवेदनशील दृष्टीकोन)