NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

शा वि निकेतनच्या मित्रांना ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ ची अनुभूती

0

नाशिक : जून 1975 मध्ये शासकीय विद्या निकेतन, नाशिकमध्ये भेटलेले 21 मित्र जून 2025 मध्ये म्हणजेच तब्बल 50 वर्षांनी पुन्हा भेटले आणि वयाच्या साठीत आपल्या मैत्रीची पन्नाशी अर्थात मैत्रीचा सुवर्णमहोत्सव या सर्व मित्रांनी अत्यंत उत्साहात साजरा केला. विशेष म्हणजे 1975 मध्ये ज्या मायमाऊली च्या कुशीत पहिली भेट झाली त्याच गंगापूर रोड वरील शाळेच्या प्रांगणात आज पुन्हा 50 वर्षांनी हे मित्र अत्यंत प्रेम, जिव्हाळ्याने भेटले.

शाळेची ही इमारत एक वारसा म्हणून ना जि मविप्र समाजाने थोर वारसा म्हणून जपली आहे. शाविनीचे माजी विद्यार्थी व मविप्र संचालक अमित पाटील यांनी या मित्रांचे स्वागत केले. गाव, खेडी, पाड्यात जे प्रतिभावान, बुद्धिमत्ताधारक, होतकरू विद्यार्थी आहेत आणि जे विशेषतः आर्थिक, सामाजिक दृष्टीने मागास आहेत अश्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेऊन त्यांनी समाज, देशासाठी योगदान द्यावे या उदात्त हेतूने तत्कालीन शिक्षण मंत्री, गांधींवादी, थोर समाजसेवक आदरणीय मधुकरराव चौधरी यांनी राज्यात 1967 मध्ये विभागावर चार शासकीय विद्या निकेतनांची स्थापना केली त्यापैकी शाविनी नाशिक ही एक शाळा. 1979 मध्ये ही शाळा धुळे येथे स्थलांतरित झाली.या शाळेतून 1981 मध्ये दहावी परीक्षा पास झालेले हे 21 बांधव पाचवीत 1975 साली प्रथम भेटले आणि त्यांच्यातील जात, धर्म, गरीब, श्रीमंत अश्या सर्व भिंती आड न येता ते गेली 50 वर्ष नियमित एकमेकांच्या संपर्कात राहिले आणि आज मैत्रीची पन्नाशी साजरी करण्यासाठी सुद्धा राज्य व देशातून विविध ठिकाणाहून ते तोच 1975 चा उत्साह, जोश घेऊन हजर राहिले.

शासकीय विद्या निकेतनने दिलेल्या संस्कारातून आणि मुशीतून घडलेल्या या बांधवांनी पत्रकारिता, समाजकारण, राजकारण,शिक्षण, शासकीय, निमशासकीय, बँकिंग, कृषी, आरोग्य सेवा,स्वतः चे उद्योग यात अत्यंत यशस्वी कामगिरी केली आहे. आदरणीय मधुकरराव चौधरी यांचा शाविनी स्थापनेचा उद्देश या बांधवांनी संपूर्ण यशस्वी केला.. आज पन्नास वर्षांनी पुन्हा एकत्र येतांना जुन्या आठवणींनी या सर्व बांधवाना गहिवरून आले आणि आयुष्यात अखेर पर्यंत ही निर्भेळ, निरोगी मैत्री जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करूया असा शब्द सर्वांनी एकमेकांना दिला.

या अनोख्या मैत्री मेळाव्यात बाजीराव सोनवणे, अनिल कुमावत,प्रताप जाधव, संजय देशमुख, अनिल चिंचोलकर,हिरामण वाघ, नाना निकम, मधुकर भामरे, नंदूशेठ वालखडे, विश्वास पाटील, गोरख बोठे, पोपट भालसिंग, अतुल गोऱ्हे, भाऊसाहेब बच्छाव, नंदकिशोर राजभोज, सुनील साबळे, चंद्रभान घुगे,किशोर झोपे या मित्रांनी हजेरी लावली.गत 50 वर्षात विविध कारणांनी चार बांधवांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या आठवणीने उपस्थित सर्व मित्र व्याकुळ, अस्वस्थ झाले.दुःखद अंतःकरणाने सर्वांनी या सोडून गेलेल्या बांधवाना श्रद्धांजली वाहिली.

या आगळ्या वेगळ्या मैत्रीच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी मित्रांना एकत्र आणण्यासाठी गेले महिनाभर प्रयत्न करणारे मित्र बाजीराव सोनवणे व अनिल कुमावत म्हणाले, ” हा सोहळा म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग ही अनुभूती देणारा आहे. पन्नास वर्षांपूर्वीचे मित्र पुन्हा भेटतात हाच मुळात आनंददायी आणि दुर्मिळ क्षण आहे आणि तो आम्हाला अनुभवायला मिळाला हे आमचं भाग्य आहे आणि त्याबद्दल परमेश्वराचे किती आभार मानावेत “.

Leave A Reply

Your email address will not be published.