- नाशिक ॲडर्व्हटायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा ) तर्फे उपक्रम
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
वर्तमानपत्राचा जन्म हा जाहिरातीसाठीच झालेला आहे, जाहिरात हा वर्तमानपत्राचा आत्मा आहे. माणसाने उत्पादनाला सुरूवात केल्यापासून जाहिरात अस्तित्वात आली आहे. शेती व्यवसाय सुरू झांल्यानंतर शेतमालाचे वितरण करण्यासाठी मौखिक जाहिरातीचा सर्वप्रथम जन्म झाला असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तमरा कांबळे यांनी केले.
राष्ट्रीय जाहिरातदिनानिमित्त मंगळवारी (दि.14) गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात नावातर्फे (नाशिक ॲडर्व्हटायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन) जाहिरात दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, नावाचे संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, अध्यक्ष अमोल कुलकर्णी, सरचिटणीस दिलीप निकम, फेमचे अध्यक्ष रवी पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
उत्तमराव कांबळे पुढे म्हणाले की, युरोप आणि पश्चिमी देशांत औद्योगिक क्रांतींमुळे उत्पादनांची निर्मिती होऊ लागली. उत्पादनाच्या विक्रीसाठी जाहिरातीची गरज भासु लागली, विक्रेते कागदावर उत्पादनाचा फोटो छापून गर्दीच्या ठिकाणी वाटायचे मात्र लोक कागद फेकत असल्याने त्याच्यासोबत हवामान, पाऊस, अपघात आणि शेतीच्या चार ओळी लिहून द्यायला लागले. व्हॅल्यु ॲडीशनमुळे लोक कागद सांभाळून ठेवू लागले. यातूनच पुढे वर्तमानपत्राचा जन्म झाला. गाडीचे, मोबाईलचे, सिनेमाचे उत्पादन झालेेले नसतांनाही जाहिरात तयार होते आणि ते ग्राहकांच्या मनाचा वेध घेते हीच जाहिरातीची ताकद आहे. विक्रेते जाहिरातीच्या माध्यमातून मार्केट जिंकतात. अन्न, वस्त्र निवाऱ्याबरोबरच जाहिरातीचीही समाजाला गरज आहे. जाहिरात म्हणजे कल्पकता , माध्यमांसोबत ग्राहकाला सुद्धा जाहिरातीची आवश्यकता असते, जाहिरता एजन्सीज डीक्टेटर झाल्या आहेत, जाहिरातीची विश्वासार्हता टिकवणे हे जाहिरता एजन्सीचे कर्तव्य आहे. आपण जाहिरात नाही तर आयडिया विकतो असेही त्यांनी सांगितले.
मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी सांगितले की, जाहिरातीच्या माध्यमातून सुमारे 1 लाख कोटींचा व्यवसाय केला जातो. आजच्या काळात जाहिरातीचे नवनवीन पॅटर्न बाजारात येत असून यासाठी आपण सजग रहायला हवे. रिल्स बनविणे हा नवीन व्यवसाय जन्माला आला आहे. त्यास लाखोंचे व्ह्युज मिळतात. वॉशिंग मशीनच्या विक्रीसाठी निरमा पावडरची जाहिरात सर्वप्रथम दुरदर्शनवर बघायला मिळाली. बांधकाम क्षेत्रामध्ये सर्वाधिक जाहिराती केल्या जातात. बाजाराचा सूर ओळखून जाहिरातींची निर्मिती करायला हवी त्यात कल्पकता असावी असेही त्यांनी शेवटी सांगितले.
सूत्रसंचालन नावाचे सल्लागार संचालक डॉ अभिजित चांदे यांनी केले. आभार दिलीप निकम यांनी मानले. कार्यक्रमास
कार्याध्यक्ष गणेश नाफडे, खजिनदार राजेश शेळके, सह चिटणीस नितीन शेवाळे, जनसंपर्क संचालक श्याम पवार, माजी अध्यक्ष नितीन राका, प्रवीण चांडक, विठ्ठल राजोळे , विठ्ठल देशपांडे, संचालक शैलेश दगडे, प्रताप पवार, रवीराज खैरनार, दिनेश गांधी, किरण पाटील, दीपक जगताप, अनिल अग्निहोत्री यांच्यासह विविध माध्यमातील जाहिरात व्यवस्थापक व प्रतिनिधी उपस्थित होते.
Comments are closed.