नाशिक : रविवारी झालेल्या मुसळधार पावसात शहरातील वर्दळीचा दहीपूल, सराफ बाजार आणि आसपासचा भाग जलमय होऊन अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. ग्राहकांसह व्यावसायिकांची तारांबळ उडाली. अकस्मात आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने व्यावसायिकांना आवरासावर करण्यास वेळ मिळाला नाही. वाहनतळावरील वाहने अस्ताव्यस्त झाली. पावसाळापूर्व नालेसफाईची कामे न झाल्याची ही परिणती असल्याचा आरोप नाशिक सराफ असोसिएशने केला आहे.
रविवारी सायंकाळी अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. प्रारंभीच्या काळात म्हणजे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १३.४ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. तासाभरात ४० मिलीमीटर पाऊस झाल्याचे सांगण्यात येते. पावसाचा फटका मध्यवर्ती भागातील बाजारपेठेला बसला. नाले आणि पाणी वाहून जाण्यासाठी स्मार्ट सिटीने केलेली यंत्रणा कुचकामी ठरली. पावसाचे पाणी दहीपूल, सराफ बाजार, फुल बाजारात घुसल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली.