NGN News
Latest Marathi News

१५० दिवसांच्या कृती आराखड्यात ‘महावितरण’ची प्रभावी अंमलबजावणी

  • वीज ग्राहकांना गतिमान सेवा आणि तक्रारींचे निवारण

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतिमान प्रशासनासाठी १५० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या नाशिक परिमंडलाने नवीन वीज जोडणी, नावात बदल, पत्यात दुरुस्ती, वीजबिल बाबत तक्रार निवारण आणि वीजपुरवठा खंडित तक्रार निवारण अशा प्रकारची विविध ग्राहकांची कामे गतीने पूर्ण करण्यात आली असून गतिमान सेवेसोबत तक्रारींचे जलद निवारण करीत ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली आहे.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी तसेच विविध विभागातील कामांना चालना देण्यासाठी व कामे तळागळापर्यंत व अधिक लोकाभिमुख करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. महावितरणच्या कोंकण प्रादेशिक परिक्षेत्राचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली, दि. २ मे २०२५ पासून सुरु झालेल्या या १५० दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रमात महावितरणच्या नाशिक परिमंडलाने २३,४६५ ग्राहकांना नवीन वीज जोडणी दिली आहे. ६,५४५ ग्राहकांच्या नावात बदल करण्यात आले आहेत. १,३४४ ग्राहकांच्या पत्यात दुरुस्ती करण्यात आली आहेत. तर २४,३५८ ग्राहकांच्या वीज देयक बाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहेत. याशिवाय, वीज पुरवठा खंडित संदर्भातील ४०,९८५ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहेत.

विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित १५० दिवसांचा कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. यानुसार महावितरण तक्रारींचे निवारण करण्याबरोबरच ग्राहकांना गतिमान सेवा देण्यासाठी कार्यरत आहे.

Comments are closed.