- ‘मविप्र’च्या समाजदिन कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सर्व क्षेत्रामध्ये विकासाचा वेग वाढत असतांना या बदलाला नवी पिढी कशी जुळवून घेते आहे यावर सर्व भविष्य अवलंबून राहणार आहे. अशा परिस्थितीत शिक्षणाने मुलांना घडविणे मोठे आव्हान असणार आहे. अशा वेगाचा वेध घेऊन पुढील शिक्षणाची दिशा ठरविण्याची गरज आहे. विज्ञान तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात अमुलाग्र बदल होत आहे. या पार्श्वभूमीवर जात,पात,पंथ या सीमा गळून पडत आहेत. बहुजनांची असलेली मविप्र संस्था ही कर्मवीर रावसाहेब थोरातांपासून कर्मवीर डॉ वसंतराव पवारांपर्यंत तळमळीने समाजहित जोपासण्याचे कार्य करीत असून कर्मवीरांचा जीवनप्रवास प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सह्याद्री फार्म चे संचालक विलास शिंदे यांनी केले.
ते मराठा विद्या प्रसारक समाजाच्या समाजदिन कार्यक्रमात संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले होते. व्यासपीठावर संस्थेचे सरचिटणीस अॅ ड नितीन ठाकरे, उपाध्यक्ष विश्वास मोरे,उपसभापती देवराम मोगल,माजी अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, संचालक डॉ सयाजी गायकवाड,डॉ प्रसाद सोनवणे, अॅ ड.संदीप गुळवे, अॅ ड.लक्ष्मण लांडगे, प्रवीण जाधव,विजय पगार,रमेश पिंगळे,अमित बोरसे, शिवाजी गडाख, महिला संचालिका शालन सोनवणे,शोभा बोरस्ते, माजी संचालक नाना महाले, डॉ विश्राम निकम, प्रल्हाद गडाख , सर्व शिक्षणाधिकारी,सर्व उपप्राचार्य उपस्थित होते.
रोजगार निर्मितीच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्राने पाऊले उचलली पाहिजे. पारंपारिक शिक्षण पद्धतीमध्ये बदल झाले आहेत. शासकीय विद्यापीठे मागे पडत असून खाजगी विद्यापीठे शैक्षणिक दृष्ट्या पुढे जात आहेत. या पार्श्वभूमीवर मविप्र संस्थेची दिवसेंदिवस प्रगती होईल अशा शुभेच्छा विलास शिंदे यांनी दिल्या.
सरचिटणीस अॅ ड.नितीन ठाकरे यांनी आपल्या मनोगतात ‘ १९१४ साली सर्वसामान्य समाजाची अवस्था दयनीय होती. बहुजन समाजाच्या हितासाठी छत्रपती शाहू महाराज व महात्मा फुले यांच्या विचाराने प्रेरित होऊन मविप्रची पायाभरणी केली गेली. उदाजी मराठा बोर्डिंग हे बहुजन समाजाच्या शिक्षणाचे केंद्र बनले. आजही मविप्र संस्था केवळ शैक्षणिक नव्हे तर आरोग्य,महिला सबलीकरण यामध्ये भरीव योगदान देत आहे. मविप्र पत्रिका ,कर्मवीर रेडीओ, मविप्र दिनदर्शिका हे उपक्रम सुरु केले तसेच वैद्यकीय महाविद्यालयात अॅन्जिओग्राफी व अॅन्जिओप्लास्टी या सुविधा सर्वासाठी २० सप्टेबरपर्यंत मोफत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ सुनील ढिकले यांनी ‘ पूर्वीच्या काळी अज्ञानामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले. राजर्षी शाहू महाराज,महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज शिक्षित होण्यासाठी प्रयत्न केले. मविप्र संस्था शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात काम करणारी महाराष्ट्रातील एकमेव शिक्षण संस्था आहे.शिक्षण संस्थांमध्ये गुणवत्ता आणि दर्जा वाढविला पाहिजे यामध्ये प्राध्यापकांनी आपले योगदान द्यावे असे विचार मांडले.
प्रास्ताविकात उपसभापती देवराम मोगल यांनी मविप्र संस्थेच्या स्थापनेपासून प्रगतीच्या विकासाचा आढावा घेतला. यावेळी इगतपुरी महाविद्यालयाच्या सह्याद्री- गाथा कर्मवीरांची या विशेषांकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सर्वोत्कृष्ट आदर्श प्राचार्य पुरस्कार डॉ एस एस काळे यांना प्रदान करण्यात आला. लोककला गजाभाऊ बेनी पुरस्कार स्वप्नील डुंबरे यांना, द गो खैरनार गुरुजी ग्रंथालय पुरस्कार माणकेश्वर वाचनालय निफाड यांना, आदर्श प्राध्यापक पुरस्कार डॉ शरद बिन्नोर यांना, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार रामदास राजोळे यांना, व्यावसायिक अभ्यासक्रम प्राध्यापक पुरस्कार डॉ अजित पाटील यांना, माजी खासदार अॅ ड उत्तमराव ढिकले कबड्डी खेळाडू पुरस्कार ईश्वर पठाडे यास, मविप्र सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार मल्लखांबपटू चेतन मानकर यास, क्रिकेटपटू पुरस्कार रसिका शिंदे यांना प्रदान करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ तुषार पाटील यांनी तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे यांनी मानले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
———————————————
मविप्र संस्थेने कर्मवीरांचा वसा व वारसा १११ वर्ष अखंडपणे चालविला असून हे एक मोठे दिव्य आहे. हि संस्था के जी टू पी जी या सर्वच क्षेत्रामध्ये पाळेमुळे रोवत आहे त्याच प्रमाणे मविप्र ने आधुनिक शिक्षणाची कास धरावी. शिवाजी आणि सह्याद्री ह्या दोन गोष्टी महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या असून आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा जोपासण्याची व वाढविण्याची आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे मत विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी व्यक्त केले.
Comments are closed.