वसई : मांत्रिकाच्या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार येथे घडला आहे. रेवती निळे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून प्राप्त माहितीनुसार, तिचे मांत्रिक अजय राणा याचा मुलगा आयुष याच्यासोबत प्रेमसंबंध होते. तथापि, कुंडलीत मृत्यू योग असून, तू खालच्या जातीची आहेस त्यामुळे माझ्या मुलासोबत तुझे लग्न होऊ शकत नाही असे तिला अजय राणाने सांगितले. यानंतर रेवतीने नैराश्यात गेली. त्यानंतर तिने याच निराशेमधून आत्महत्या केली असल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
याबाबत वसई पोलीस ठाण्यात मांत्रिक आणि त्याच्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मंत्रिकाविरोधात गुन्हा दाखल होऊन सुद्धा वसई पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप केला जात आहे. मांत्रिक आजय राणा हा वसईच्या किल्ल्यातील मंदिरात अनधिकृतपणे ठाण मांडून तेथे जादूटोणा करायचा. त्याचे पोलिसात चांगले संबंध असल्याने पोलीस त्याच्याविरोधात कारवाई करत नाहीत असं अगदी किल्ल्यातील अघोरी प्रकारांच्या फोटोसीत आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात पुरातत्व खात्याच्या बेजबाबदारपणावरुनही हल्लाबोल केला जात आहे. वसई पोलिसांनी योग्य ती कार्यवाही केली नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया थेट वसई पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्या. या प्रकरणामध्ये राजकीय दबाव होता त्यामुळे या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, असे दमानियांनी पोलिसांसमोर आपले म्हणणे मांडले.